Thursday 26 October 2017

दावडी ची गढी - गायकवाड घराण्याच्या इतिहासाची साक्षीदार

       मित्रहो आपला महाराष्ट्र प्रसिद्ध आहे सह्याद्रीतल्या गडकोट-किल्ल्यांसाठी,लेणी आणि मंदिरांसाठी तसेच इथल्या दैदिप्यमान इतिहासासाठी.महाराष्ट्राचे हे सारे सांस्कृतिक वैभव टिकून राहिले ते पिढ्यान् पिढ्या इथं नांदणाऱ्या मराठी घराण्यांमुळे.या घराण्यांमध्ये राजकारण, समाजकारण,धर्मकार्य अशा अनेक  आघाड्यांवर आपला ठसा उमटवणारे पराक्रमी,धोरणी आणि विद्वान पुरुष जन्माला आले.
        महाराष्ट्राच्या खेडोपाडी आजही अशा घराण्यांची स्मृती जागविणारे जुने वाडे आणि छोटेखानी गढ्या शिल्लक आहेत तर काही काळाच्या ओघात विस्मृतीत गेले आहेत.आपण अशाच काही अल्प-परिचित वाड्यांची थोडीफार माहिती करून घेऊ.



 गायकवाड यांची दावडी गावची गढी :


         महाराष्ट्रात काही गावे तटबंदीयुक्त आहेत त्यापैकी एक म्हणजे दावडी हे गाव !
 हे गाव चहुबाजूने भक्कम तटबंदीने वेढलेले आहे. काही ठिकाणी तर खंदक अजूनही शिल्लक आहे.या गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाहू काळात नावारुपाला आलेल्या दामाजी आणि पिलाजी गायकवाडांच्या पराक्रमाची साक्ष देणारी  ईथली भक्कम गढी.



          दावडी गावचे दामाजीराव आणि पिलाजीराव गायकवाड हे काका-पुतणे पेशव्यांच्या सोबत गुजरात स्वारी मध्ये अनेक पराक्रम करून उच्च पदावर पोहोचले व पुढे बडोद्यात स्थायिक झाले.नंतरच्या काळात बडोदा हे स्वतंत्र संस्थान म्हणून नावारूपाला आले
        पुढे कौळण(ता.मालेगाव) च्या काशिराव गायकवाड यांचा गुरे राखणारा मुलगा याच बडोदे संस्थानात दत्तक गेला आणि प्रसिद्ध सयाजीराव (तिसरे) गायकवाड म्हणून एक आदर्श राज्यकर्ता बनला.
        बडोद्याचे गायकवाड वंशज आपल्या या मूळ गावी भेटी देण्यासाठी तसेच जवळच असलेल्या निमगाव खंडोबाच्या दर्शनाला येत असतात.          

                

गढी ची सध्यस्थिती:
   या गढीचा मुख्य दरवाजा, तिथले भक्कम बुरुज आणि पक्क्या विटावापरून बांधलेल्या जाड भिंती हे सारंच ईतकं भव्य आहे की बघताना धडकी भरेल.





मुख्य दरवाज्यावर गणेशपट्टी आणि शरभाची शिल्पे कोरलेली आहेत.या दरवाज्यातून हत्ती जाईल ईतपत त्याची उंची ठेवलेली आहे.मुख्य दरवाज्याच्या माथ्यावर सध्या मोडकळीस आलेला नगारखाना देखिल आहे.मुख्य दरवाजातून आत गेले कि साधारण २०० x २०० फुटाचे मोकळे पटांगण दिसते.



   

   
पश्चिमेस असलेल्या एका भुयारी मार्गाशिवाय कोणतीही वास्तू आता शिल्लक नाही.सध्या हे भुयार मुजलेले आहे.गावकरी सांगतात कि खाली १० ते १५ फुटाच्या ३ खोल्या आहेत.
  
 
   

या गढी व्यतिरिक्त पिलाजी गायकवाड यांचा एक जुना वाडा तसेच गायकवाड वंशातले फत्तेसिंह गायकवाड यांचा एक राहता वाडा आणि दरबार हॉल या वास्तू गढीशेजारीच आहेत.गायकवाड घराण्याच्या दानशूर परंपरेला अनुसरून त्यांनी हा वाडा रयत शिक्षण संस्थेला दिला.आता तेथे शाळाआहे.शाळेशेजारीच जुन्या काळातले पाणीपुरवठा करणारे हौद आहेत. गावातल्या रस्ताने चालताना तुरळक ठिकाणी दगडी नळ दिसून येतात.
   
  दावडीच्या चौकात किंवा पारावर बसलेल्या एखाद्या म्हातारबाबाला सोबत घेतलंत तर गावाची तटबंदी,गावातले जुने वाडे आणि गढी बघताना फत्तेसिह गायकवाड यांच्या आठवणी नक्कीच ऐकायला मिळतील




निमगावचा खंडोबा :
  
    दावडी पासून जवळच निमगाव या गावी गढीवजा खंडोबा मंदिर आहे.चोहो बाजूने तटबंदी आणि सुंदर कमानी असलेल्या धर्मशाळा प्रशस्त आवार असलेले हे खंडोबा मंदिर !!
 


   मंदिराच्या आवारात २ शिलालेख आहेत.एक दीपमाळेवर तर दुसरा पाठीमागे म्हाळसा मंदिराच्या भिंतीवर आहे. गायकवाड यांचे दिवाण चंद्रचूड यांनी  मंदिराच्या शिखराचे काम केल्याचा उल्लेख त्यात आहे.पैकी एकाचे वाचन खालीप्रमाणे
 
श्री मार्तंडे  । तत्पर । गाय । कावा ।
Sसर । कार । सयाजीराव महाराज श । 
क १८-०१ (५) सुभानु । नाम । स.माघ.शु.११

वाट वाकडी करून हे  गढीवजा मंदिरही पहायला हरकत नाही.

 




कसे जायचे :
    इतिहासाची सोनेरी वर्षे पाहिलेल्या या गावाला भेट द्यायची असेल तर पुण्याहुन आळंदी-वडगाव घेनंद मार्गे दावडी ला जावे किंवा राजगुरूनगर पाबळ रस्त्याने रेतवडी गावातून दावडी ला जाता येईल.
याच परिसरात अजूनही अनेक जुने वाडे आणि गढी आहेत त्यांची ओळख नंतर करून घेऊच.



 




पण भटकंती करताना खालील गोष्टींचे भान असू द्या !!!